जिल्ह्यातील शिक्षकांच्या होणार बदल्या   

पुणे : जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या बदली प्रक्रियेसंदर्भात निर्माण झालेला पेच अखेर सुटला आहे. सन २०२४-२५ या वर्षाच्या संच मान्यतेनुसार बदल्या कराव्यात असा स्पष्ट निर्देश राज्यशानाने दिला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून बदली प्रक्रिया राबविण्यासाठी तयारी सुरू केली आहे.
 
शिक्षकांच्या बदली प्रक्रियेसाठी राज्यातील काही जिल्हा परिषदांकडून २०२३-२४ ची संच मान्यता गृहित धरली होती. तर काही जिल्ह्यांनी २०२४-२५ ची संच मान्यता विचारात घेऊन प्रक्रिया सुरू केली होती. त्यावर राज्याच्या ग्रामविकास विभागाकडून घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये २०२४-२५ च्या संच मान्यतेप्रमाणे बदली करण्याचे सांगण्यात आले. कोणत्याही वर्षाची संच मान्यता बदली प्रक्रियेसाठी गृहित धरावी यासाठी काही जिल्हा परिषदांकडून मार्गदर्शन मागविण्यात आले होते. त्यानंतर झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
 
दरम्यान, या संच मान्यतेनुसार शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय नाईकडे म्हणाले, शासनाने २०२४-२५ च्या संच मान्यतेप्रमाणे शिक्षकांच्या बदल्या करण्यास सांगितले आहे. त्यानुसार आम्ही तयारी सुरू केली आहे. पुढील काही दिवसांमध्ये पात्र शिक्षकांची बदली प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. त्यापूर्वी आम्ही बदली प्रक्रियेच्या तयारीवर अधिक भर दिला आहे.

Related Articles